
देवळात जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात,
चार-आठ आणे टाकून
काही ना काही मागतात.
जन्मभर जळल्यावर
मेल्यावर पण जाळतात
लाकडापेक्षा माणसंच
लाकडाचे गुणधर्म पाळतात.
मी आहेच असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पान गळतानासुध्दा
तन्मयतेन पाहणारा
खुपदा माझा एकलेपणा
माझ्याशी बोलका होतो
मग कोणी एक शब्द जरी बोललं,
तर त्याचाही गलका होतो.
इथे वेडे असण्याचे
खुप फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत